नगरपरिषद प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा; पाणीपुरवठा पूर्ववत
खेड: शहरातील कुंभारआळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला पाणीटंचाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून नगरपरिषद प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवडाभरापासून परिसरातील नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सतीश चिकणे, नगरसेविका रसिका खेडेकर, नगरसेवक भूषण खिवले, मुख्याधिकारी महादेव रोडगे तसेच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून तांत्रिक बिघाड दूर केला. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला.
पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरप्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीचे कौतुक केले. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
--
إرسال تعليق