खेड : भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नमो दहीहंडी उत्सव-२०२६’ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लेझर लाईट, भव्य व्यासपीठ, बालगोपालांचा उत्साह आणि गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीने परिसर ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
भाजपा नेते तथा वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून हा उत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे. यंदाही दापोली, हर्णे, चिपळूण आणि खेड परिसरातील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
खेड तालुक्यातील पाच गोविंदा पथकांनी तब्बल आठ थर रचत उपस्थितांची दाद मिळवली. यामध्ये हिंदूराज गोविंदा पथक (खेड), हिंदूराज गोविंदा पथक (दापोली), खेमनाथ गोविंदा पथक (सुसेरी-खारी), एकविरा गोविंदा पथक (कुंभारवाडा) आणि आई खोंडेकरिन गोविंदा पथक (खोंडे) यांचा समावेश होता.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व पथकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी अॅड. वैभव खेडेकर यांनी गोविंदा पथकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
दहीहंडी हा केवळ धार्मिक व पारंपरिक उत्सव नसून सामाजिक एकता, तरुणाईचे सामर्थ्य आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
--
إرسال تعليق