खानापूर : सीमाप्रश्नावरून २००६ मध्ये झालेल्या आंदोलनप्रकरणी महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची खानापूर न्यायालयाने मंगळवारी, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी निर्दोष मुक्तता केली. सुमारे २० वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा अखेर निकाल लागला.
२००६ साली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा प्रश्नासंदर्भात खानापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध नेते उपस्थित होते. यावेळी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या भाषणानंतर खानापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ आणि १५३/अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी खानापूर न्यायालयात सुरू होती.
सुनावणीदरम्यान रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील हे न्यायालयात हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यावेळी समितीचे कार्यकर्ते यशवंत बिरजे आणि महादेव घाडी यांनी न्यायालयात जामीन घेतला होता. रामदास कदम यांना १० लाख रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने पुराव्याअभावी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अॅड. शामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंच्चन्नावर यांनी काम पाहिले.
दरम्यान, २००६ मध्ये सीमाप्रश्नाच्या मागणीसाठी बेळगाव-खानापूर परिसरात झालेल्या आंदोलनात मराठी भाषिकांच्या प्रश्नासाठी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी घेतलेली भूमिका या निकालामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
--
إرسال تعليق